यशवंत मराठे यांच्या `छपाई ते लेखणी’चे शानदार प्रकाशन सहज अन् सोप्या पद्धतीने सुसंवाद साधणारे,लेखनच वाचकांना भावते – जयराज साळगांवकर
- by Adarsh Maharashtra
- Feb 10, 2021
- 1896 views
मुंबई : मराठे उद्योग समूहातील तिस-या पिढीचे उद्योजक यशवंत मराठे यांनी लिहिलेले `छपाई ते लेखणी’ हे पुस्तक म्हणजे सहज आणि सोप्या पद्धतीने वाचकांशी सुसंवाद साधणारे आहे, लेखनशैली अत्यंत पारदर्शक आहे. लेखक आपल्याशी गप्पा मारतोय असे वाटते. तसेच काही महत्वाच्या विषयांना हात घालण्याचे धाडस दिसून येते, असेच लिखाण वाचकांना भावते, असे विचार सुप्रसिद्ध लेखक आणि उद्योजक जयराज साळगांवकर यांनी व्यक्त केले.
उद्योजक यशवंत मराठे यांनी व्यावसायिक कार्य सांभाळत आपल्यातील साहित्यिक गुणांना वाव देत `सरमिसळ’ नावाचे स्फुट लेखन केले. यात इतिहास, संस्कृती, चालू घडामोडी, तत्वज्ञान, आठवणी, व्यक्तिचित्रणे, प्रवास वर्णने, बालपणाच्या आठवणी अशा अनेकविध विषयांना समाविष्ट केले आहे. त्याच्या एकत्रित संकलनातून `छपाई ते लेखणी’ हे पुस्तक ग्रंथालीने प्रकाशित केले असून त्याचे शानदार प्रकाशन प्रभादेवी येथील मराठे उद्योग भवनात जयराज साळगांवकर, ज्येष्ठ पत्रकार सुधीर जोगळेकर, ग्रंथालीचे विश्वस्त सुदेश हिंगलासपूर यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.
`छपाई ते लेखणी’ ही साहित्यकृती नव-सृजन या निकषात बसणारी आहे. व्यक्तिचित्रणे हा या पुस्तकातील एक अत्यंत तरल आणि मनोज्ञ असा भाग आहे. प्रत्येक लेख हा वास्तववादी आणि अभ्यासपूर्ण असून लेखकाची चिकित्सक वृत्ती त्यातून दिसून येते, असे विचार सुधीर जोगळेकर यांनी व्यक्त केले.
उद्योगपती ते सामाजिक कार्य ते आता हौशी लेखक असा हा प्रवास आहे. सच्चेपणाने लिहिणे हे माझे ब्रीदवाक्य आहे. मनातील विचार कागदावर उतरवून मन हलके करत असतानाच ते कधी साहित्यात आणि पुस्तकरुपाने परावर्तित झाले, हे समजलेच नाही, त्यामुळे हे सारे काही नकळत आणि उत्सफूर्तपणे होत गेले, असे विचार लेखक यशवंत मराठे यांनी व्यक्त केले.
उत्तम साहित्यकृती प्रकाशित करणे हे ग्रंथालीचे वैशिष्ट्य असून यशस्वी उद्योजकाचे चौफेर लेखन असे या पुस्तकाचे वर्णन करता येईल, हे साहित्य वाचकांपुढे सादर करून एक उत्तम साहित्यकृती वाचल्याचा अनुभव त्यांना नक्कीच येईल, असा विश्वास ग्रंथालीचे विश्वस्त सुदेश हिंगलासपूर यांनी व्यक्त केला.
यावेळी साहित्यरसिक मान्यवर उपस्थित होते. अत्यंत देखण्या अशा या सोहळ्याचे आयोजन कोरोना काळातील शासकीय नियमांचे पालन करून केले गेले.

रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम