मुंबईत कोरोना नियंत्रणात, पुन्हा लॉकडाऊनची गरज नाही : मुंबई महापालिका आयुक्त
- by Reporter
- Jul 13, 2020
- 1793 views
मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईकरांसाठी कोरोनाबाबत एक मोठी आणि दिलासादायक बातमी. पुणे आणि ठाणे यांसारख्या शहरांमध्ये वाढत्या रुग्णसंख्येमुळे पुन्हा लॉकडाऊन करण्याची गरज पडतेय. मात्र, या शहरांच्या तुलनेत मुंबई कोरोनाला रोखण्यात यशस्वी ठरत असल्याचं चित्र आहे. राज्यात सर्वाधिक रुग्णसंख्या असलेल्या मुंबईत रुग्णसंख्या दुपटीचा कालावधीनं पन्नाशी गाठली आहे.
मुंबईतला रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी ५० दिवसांवर, तर मुंबईतला रुग्णवाढीचा वेगही मंदावला आहे.
ठाण्यात रुग्णवाढीचा वेग 3.२% आहे तर रुग्णदुपटीचा कालावधीही केवळ २५.१३ दिवसांचा आहे.
पुण्यात रुग्णदुपटीचा कालावधी१९.७ दिवस आहे तर रुग्णावाढीचा वेग ४ टक्के. पुणे आणि ठाणे शहरांच्या तुलनेत मुंबईतील परिस्थिती नियंत्रणात आहे.
११ मार्च २०२० ला मुंबईत कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला. आणि बघता बघता अख्ख्या मुंबईत कोरोनानं आपले हातपाय पसरले. जशी कोरोनाची एन्ट्री मुंबईतल्या झोपडपट्ट्यांमध्ये झाली, तशी मुंबईची चिंता आणखीनच गडद झाली. पण, संकट कोणतंही येऊ दे हार मानेल ती मुंबई कसली. डॉक्टर, नर्सेस, वॉर्डबॉय, सफाई कामगार, पोलीस यंत्रणा, पालिका प्रशासन या साखळीनं अखेर कोरोनाच्या साखळीला सुरुंग लावलाच.
आज मुंबईत राज्यातील सर्वात जास्त रुग्ण असले तरी मुंबई नियंत्रणात कशी असा प्रश्न तुम्हांला पडला असेल. मात्र, "मुंबई, ठाणे आणि पुणे या शहरांपेक्षा कोरोनाबाबत नियंत्रणात आहे, इथे पुन्हा लॉकडाऊनची गरज नाही" असं आयुक्त इकबाल चहल यांनी सांगितलंय. याचं मुख्य कारण म्हणजे मुंबई महापालिकेनं रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधीचं 'अर्धशतक' गाठलंय. तर, रुग्ण वाढीचा वेगही मंदावलाय.
कोरोना या आजाराच्या संसर्गाचे विश्लेषण करताना त्यात रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. रुग्ण दुप्पट होण्यास लागणारे 'दिवस' म्हणजेच कालावधी जेवढा अधिक तेवढी सदर बाब अधिक सकारात्मक असते. २२ मार्च २०२० ला रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी हा केवळ ३ दिवस होता. १५ एप्रिलला ५ दिवस, हळहळु वाढत १६ जूनला रोजी ३० दिवसांवर गेला तर १० जुलै २०२० रोजी दिवस अखेरीस हा कालावधी तब्बल ५० दिवसांवर पोहचला आहे. हाच वेग मुंबई, वांद्रे पूर्व - खार पूर्व - सांताक्रूज पूर्व इत्यादी परिसरांचा समावेश असलेल्या 'एच पूर्व' विभागात १३४ दिवस एवढा झाला आहे.
"फोर टी" कोरोनाला मात देणारी चतु:सुत्री
चेस द वायरस आणि 'ट्रेसिंग – ट्रॅकींग – टेस्टींग – ट्रिटिंग' ची चतु:सूत्री महापालिकेनं वापरली. आणि हा फॉर्म्युला धारावीसारख्या ठिकाणी देखील यशस्वी ठरला. तसंच, नव्यानं तयार झालेल्या उत्तर मुंबईतही पालिकेनं मिशन झिरोची सुरुवात केली आहे.
मुंबईत रुग्णसंख्या वाढायला लागली, तेव्हा कोरोना बाधित मुंबईकरांना रुग्णखाटा मिळण्यासाठी सक्षम आरोग्य यंत्ररणा असणं आवश्ययक होतं. सुरुवातीच्या काळात बेडस् मिळवताना जी धांदल उडायची त्यावर उपाय म्हणून महापालिकेनं SOP तयार केली. यात खाजगी लॅबकडून कोरोना चाचणीचा अहवाल २४ तासांच्या आत महापालिकेकडे देणं बंधनकारक केलं. बाधित व्यक्तीच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेऊन त्यांचे विलगीकरण केलं. पालिकेच्या वॉर रुमच्या माध्यमातून रुग्णांना औषधोपचार मिळवून दिले.
डबलींग रेट ५० दिवसांवर गेला असला तरी लढाई संपली असं नाही. ज्या भागांमधील रुग्ण दुप्पटीचा कालावधी सरासरीपेक्षा कमी असेल, त्या विभागांमध्ये शीघ्रकृती कार्यक्रम नियमितपणे राबविण्यात येत आहे. या अंतर्गत प्रामुख्याने ५० फिरते क्लिनिक (मोबाईल डिस्पेन्सरी व्हॅन) विविध परिसरांमध्ये जाऊन प्राथमिक तपासणी व चाचणी करुन बाधितांचा शोध घेत आहेत. पुढचे २-३ आठवडे हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे.

रिपोर्टर